मुंबई, 15 जून: मुंबईत मान्सूनचं (Monsoon in mumbai) आगमन झाल्यानंतर पावसानं मुंबईकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. पहिल्या पावसातचं मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली होती. पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये अतिवृष्टीचा (Very Heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे.
मागच्या आठवड्यात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलं असून अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
आज पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या साथीनं मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याची सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
तर उद्या (16 जून) रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उद्या मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.